जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने फ्लॉवर, भुईमूग, बाजरी पिकाचे नुकसान   

ओतूर, (वार्ताहर) : उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असून अवकाळी पावसाने कहर केला आहे. उन्हाळी हंगामातील फ्लॉवर कोबी, झेंडू, उन्हाळी भुईमूग, बाजरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
जुन्नर तालुक्यात मान्सून पुर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. १२ मे पासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मागील सहा दिवसापासून रोज जोरदार रिप रिप पाऊस सुरू आहे. मागील सोळा वर्षाच्या कालखंडामध्ये, आत्तापर्यंत हा पहिल्यांदा असा पाऊस पडत आहे, असे माळशेज परिसरातील शेतकरी सांगत आहेत.
 
तालुक्याचे तापमान ४० ते ४२ अंशावर गेलेले असताना अंगाची लाही लाही होत होती. अशातच अचानक अवकाळी पावसाने जोरदार सुरुवात केली. यामुळे कोबी फ्लॉवर, झेंडू, पिकांची वाढ थांबली असून, त्यावर करपा व घाण्या हा रोग येण्यास सुरुवात झाली असून झेंडू पिकांना टिक पडायला सुरुवात झाली असे असेही झेंडू उत्पादक शेतकरी सांगत आहेत. झेंडूची झाडे पावसाच्या पाण्याच्या, वजनाने कोलमडून मोडून पडत आहे. जुन्नर तालुक्यामध्ये घेतले जाणारे उन्हाळी बाजरीचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे. उन्हाळी बाजरीच्या कणसांना पिके उभी असतानाच, आता कोंब येऊ लागले आहेत. बाजरीचे कणीस पूर्णपणे खराब झाले असून, बाजरी खाण्यायोग्य राहिलेली नाही, त्यामुळे शासनाने धना, मेथी, शेपू, फ्लॉवर, झेंडू, बाजरी आदी पिकांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Articles